जलसंपदा विभागाने शेतीच्या पाणी आवर्तनाचे योग्य नियोजन करावे – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी ,दि. ७ –

शेतकऱ्यांना योग्य वेळेत पाणी मिळेल यासाठी जलसंपदा विभागाने पाण्याचे योग्य नियोजन करून आवर्तनाचे वेळापत्रक तयार करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.  भविष्यात पाण्याची समस्या उद्भवू नये यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी बांधवांना केले.

प्रवरा आणि गोदावरी लाभक्षेत्रातील पाण्याची सद्यस्थिती, शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मागण्या आणि सिंचन नियोजनाबाबत जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय सभागृहात समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले. 

धरणे भरलेली असली तरी पाऊस लांबल्यामुळे निर्माण झालेल्या पाणी आव्हानांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, आमदार अमोल खताळ, जलसंपदा विभागाचे अभियंता गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे, स्वप्नील काळे, सायली पाटील यांच्यासह  विविध राजकीय प्रतिनिधी म्हणून नितीन दिनकर,कपिल पवार, डॉ. भास्करराव खर्डे, शिवाजीराव जोंधळे, कैलास तांबे, आबासाहेब थोरात, गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ, बापूसाहेब देशमुख, यांची उपस्थिती होती 

  भंडारदरा, निळवंडे आणि गोदावरी धरणांमधून उपलब्ध पाण्यावर आवर्तनाचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

तसेच नदीपात्रातून होत असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाबाबत मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. जलसंपदा विभागाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आवश्यक असून नियमांचा कठोर आधार घेऊन तातडीने कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.

शेतकऱ्यांचे वीज प्रश्न व इतर मागण्या

   बैठकीत शेतकऱ्यांनी विजेच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री विखे पाटील यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन भारनियमनाच्या समस्येवर तातडीने मार्ग काढण्याचे व शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले. तसेच, आमदार अमोल खताळ यांनी भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश केल्याबद्दल आणि साकूर उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळाल्याबद्दल मंत्र्यांचे आभार  लवकरात लवकर पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *