“दादा चा वादा” राहुरीत डांबरीकरण पूर्ण; यात्रेआधीच वाहतुकीला दिलासा

राहुरी वेब प्रतिनिधी, (शरद पाचारणे): नगर–मनमाड महामार्गाच्या कामामुळे गेल्या काही दिवसांत राहुरी शहरात वाहतूक कोंडी, धूळ आणि दैनंदिन गैरसोयी वाढल्या होत्या. त्यातच ग्रामदैवत खंडोबा महाराजांच्या यात्रोत्सवाची तयारी सुरू असताना रस्त्याची अपूर्ण अवस्था नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरली होती. मात्र यात्रेपूर्वीच शहरालगतचा डांबरीकरणाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.खंडोबा यात्रेला दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. अपूर्ण रस्त्यांमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी स्थानिकांकडून रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी कामाचा वेग वाढवला.भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सकाळी राहुरीत येऊन कामाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी ठेकेदार व अधिकाऱ्यांना यात्रेपूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर कामात गती आल्याचे स्थानिकांनी सांगितले.शहरातील मुख्य मार्गावरील डांबरीकरण पूर्ण झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांसह यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांनाही सोयीचे झाले आहे.रस्त्याचे काम वेळेत पूर्ण झाल्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. “यात्रेपूर्वी रस्ता पूर्ण झाल्याने मोठी अडचण टळली,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली. तसेच, अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला आता गती मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.नगर–मनमाड महामार्गाच्या उर्वरित कामांकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे. सुरू असलेली कामे नियोजित वेळेत पूर्ण झाल्यास परिसरातील वाहतूक आणि पायाभूत सुविधा अधिक सुधारतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *